Monday, December 6, 2010
महापरिनिर्वाण दिन...
एका वर्षापूर्वी बरोब्बर याच दिवशी म्हणजे ६ डिसेंबर २००९ रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाण्याचा योग आला. मुंबई विद्दयापीठातील पत्रकारिता विभागाने शिवाजी पार्क,दादर येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी केंद्र उभारले होते. देशातून लाखोंच्यावर लोक तिथे येतात हे ऎकुन माहित होते पण कधी प्रत्यक्ष डोळयांनी पाहिले नव्हते. मी आणि प्रमोद ५ डिसेंबर पासूनच शिवाजी पार्क वर होतो. मध्यरात्रीपासूनच तिथे गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांना मानणारे त्यांचे अनुयायी कुटुंबासहित येत होते. एवढया मोठयाप्रमाणावर जनसागर येत असूनही सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांच्या मदतीने सगळे सुरळीत आणि शिस्तीत चालले होते हे विशेष. एवढया मोठया प्रमाणवर जनसागर लोटला होता तो केवळ एका माणसासाठी. त्यांना कोणी जबरदस्तीही केली नव्हती कि त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची सभाही नव्हती जिथे पैसे देऊन माणसे आणली जातात. भीमरायाचा गजर करत हा जनसागर लोटला होता .आजच्या काळात एका माणसासाठी इतक्या मोठया प्रमाणावर त्यांना अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय जमतो हीच अभूतपूर्व गोष्ट आहे. कुठेही दिसणार नाही अथवा मिळणार नाही अशी वैचारीक आणि अभ्यासू पुस्तकेही तिथे पाहायला मिळाली. आर्थिक, सामाजिक दृष्ट्या पिचलेला असतानाही हा समाज पदरमोड करुन एक तरी पुस्तक विकत घेत होता. निरनिराळया ठिकाणाहून आलेली माणसे लोककलेचे उत्तम सादरीकरण करत होते. प्रत्येकाच्या मुखी भीमरायाचे नाव होते. आपापल्या घरी परतताना येथील प्रत्येक व्यक्ती आपल्या सोबत घेऊन जाणार होती, बाबासाहेबांचे जाज्वल्य विचार आणि स्वाभिमान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एवढेच म्हणावेसे वाटते कि असा माणूस पुन्हा होणे नाही. न भूतो न भविष्यती....
चाय..ला
आम्ही अट्टल चहाबाज,चोवीस तासात केव्हाही चहा घेऊ शकणारे.कधीही विचारले तरी चहा घ्यायला सदैव तयार बर अर्धाच कप दया,मी आत्ताच घेतला आहे असली वाक्ये आम्ही टाळतोच. का कोण जाणे चहावरच्या या प्रेमाखातर चहाच्या अतिसेवनामुळे होणारी acidity कधी होत नाही.दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो असे म्हणतात पण जर दिवसाची सुरुवात जर चहाने झाली तर दिवस अधिक चांगला जातो.सकाळचा चहा आणि त्याबरोबर वाचायला पेपर याची मजा काही औरच. सर्व सरकारी कचेऱ्या,कार्यालये,विविध खाती यामधे चहापाणी हा समान दुआ आहे.तिथे चहापाणी घेतल्याशिवाय काम होत नाही म्हणजे कामाला हात लावत नाही इतके त्यांचे चहावर प्रेम असते. चहा हे उत्तेजक पेय आहे पण त्याला काळवेळ याचे बंधन नसते. दुसरे उत्तेजक पेय ठरविक वेळीच पिण्यात मजा असते.पण चहा प्यायला काळाचेच काय कारणांचे ही बंधन लागत नाही. थकल्याभागल्यावर किंवा सकाळीउठल्यावर, मिटींगमधे, लेक्चरनंतर, परिक्षा चालू असतांना, ट्रेकींग करतांना चहा हा हवाच. जवळपास सर्वच वयोगटांच्या लोकांमधे चहा प्रिय आहे.कट्टयावर, टपरीवर चहा पित पित चर्चा आणि वादविवाद करणारे अनेकजण आपण बघतो. वयोमानानुसार चर्चेचे विषय जरी वेगवेगळे असले तरी चहा हा दुआ समान असतो.मी चहा पीत नाही, मी फक्त कॉफी पितो/पिते, शी चहा काय असे म्हणणारे महाभाग भेटतात अशा लोकांपासून आम्ही दोन हात दूरच राहतो. खर तर अशा लोकांना ग्रुपमधे खुप शिव्या खाव्या लागतात ती गोष्ट वेगळी.
आत्ता आपण ज्याप्रकारे चहा उठताबसता पिऊ शकतो तस फार पूर्वी करण अशक्य गोष्ट होती. तेव्हा नुकताच चहा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला असावा. चहा या पेयाला प्रखर विरोधही झाल्याची नोंद इतिहासात सापडते. पुण्यातील पंचहौद मिशन चे चहा-ग्रामण्य प्रकरण तर इतिहासात चांगलेच गाजले होते.हरि नारायण आपटे यांनी आपल्या निवडक मित्रांना पाठविलेली चिठ्ठी अशी होती- उदईक दुपारी आमचेकडे श्रीस्वामी येणार आहे बरोबर शिष्यस्वामीही असतील तरी आपण अगत्य येण्याचे करावे.यातील श्रीस्वामी म्हणजे चहा आणि शिष्यस्वामी म्हणजे बिस्कीट.चोरीचा मामला आणि चहाला प्याला.(संदर्भ: जन-मन,लेखक अरुण टिकेकर) यावरुन लक्षात येईल कि पूर्वी चहा चारचौघात पिणे किती अवघड होते.हळुहळु चहा पेय जनमानसात स्थान निर्माण करु लागले आणि आतातर आपल्या जीवनाचा एक भाग बनून राहिले आहे. आता एक कटिंग, स्पेशल, एक मसाला चाय,अदरक डालके, अण्णा सिंगल अशे आवाज आपण जागोजागी ऐकतो. असं म्हणतात कि बायांनी कुंकवाला तर पुरुषांनी चहाला नाही म्हणू नये.इतकेच काय तर घरातल्या माणसाची ओळख किंवा त्यांचे संस्कार हे त्यांनी बनविलेल्या चहाच्या चवीनुसार ठरविले जातात. ब-याच दिवसांनी घरी सगळे एकत्र जमले की रात्री बाराला चहा झालाच पाहीजे, नाहीतर भेटल्यासारखे वाटत नाही. चहा हे एक अजब रसायन आहे. नुसते साखर आणि चहा टाकुन उकळवलेले पाणी नव्हे. तो उकळेपर्यंत वाट बघावी लागते.. गरम असताना त्याचा एकदम मोठा घोट घेतला तर जीभ भाजते. तो कलेकलेने आणि फुंकून फुंकूनच प्यावा लागतो. ज्याला हे जमतं तो आयुष्यात सुखी होतो. तुम्ही हे वाचायचे कष्ट घ्या तोवर मी आलोच एक कटिंग मारून.
आत्ता आपण ज्याप्रकारे चहा उठताबसता पिऊ शकतो तस फार पूर्वी करण अशक्य गोष्ट होती. तेव्हा नुकताच चहा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला असावा. चहा या पेयाला प्रखर विरोधही झाल्याची नोंद इतिहासात सापडते. पुण्यातील पंचहौद मिशन चे चहा-ग्रामण्य प्रकरण तर इतिहासात चांगलेच गाजले होते.हरि नारायण आपटे यांनी आपल्या निवडक मित्रांना पाठविलेली चिठ्ठी अशी होती- उदईक दुपारी आमचेकडे श्रीस्वामी येणार आहे बरोबर शिष्यस्वामीही असतील तरी आपण अगत्य येण्याचे करावे.यातील श्रीस्वामी म्हणजे चहा आणि शिष्यस्वामी म्हणजे बिस्कीट.चोरीचा मामला आणि चहाला प्याला.(संदर्भ: जन-मन,लेखक अरुण टिकेकर) यावरुन लक्षात येईल कि पूर्वी चहा चारचौघात पिणे किती अवघड होते.हळुहळु चहा पेय जनमानसात स्थान निर्माण करु लागले आणि आतातर आपल्या जीवनाचा एक भाग बनून राहिले आहे. आता एक कटिंग, स्पेशल, एक मसाला चाय,अदरक डालके, अण्णा सिंगल अशे आवाज आपण जागोजागी ऐकतो. असं म्हणतात कि बायांनी कुंकवाला तर पुरुषांनी चहाला नाही म्हणू नये.इतकेच काय तर घरातल्या माणसाची ओळख किंवा त्यांचे संस्कार हे त्यांनी बनविलेल्या चहाच्या चवीनुसार ठरविले जातात. ब-याच दिवसांनी घरी सगळे एकत्र जमले की रात्री बाराला चहा झालाच पाहीजे, नाहीतर भेटल्यासारखे वाटत नाही. चहा हे एक अजब रसायन आहे. नुसते साखर आणि चहा टाकुन उकळवलेले पाणी नव्हे. तो उकळेपर्यंत वाट बघावी लागते.. गरम असताना त्याचा एकदम मोठा घोट घेतला तर जीभ भाजते. तो कलेकलेने आणि फुंकून फुंकूनच प्यावा लागतो. ज्याला हे जमतं तो आयुष्यात सुखी होतो. तुम्ही हे वाचायचे कष्ट घ्या तोवर मी आलोच एक कटिंग मारून.
Subscribe to:
Comments (Atom)
